"सोलापूर १९०३: प्लेगच्या सावटात डॉ. आर्ली आणि डॉ.सोनूबाईंच्या ख्रिसमसच्या आठवणी"

Jungle day's -1913
 ( डॉ. आर्ली मुन्सन यांच्या 1913 साली प्रसिद्ध झालेल्या jungle days पुस्तकातील सोलापूर विषयी आठवणींचा संपादित अंश)
जंगल डेज' (Jungle Days - १९१३) हे पुस्तक अमेरिकन महिला डॉक्टर डॉ. आर्ली मुन्सन (Dr. Arley Munson) यांनी लिहिले आहे. त्यांनी १९०३ च्या सुमारास भारतात वैद्यकीय सेवा दिली. या पुस्तकातील सोलापूर या प्रकरणात लेखिका व सोलापूरच्या त्यांच्या कॉलेज मैत्रीण असलेल्या डॉ. सोनुबाई या सुट्टीसाठी आमेरिकेहून भारतात परतल्या होत्या त्यावेळच सोलापूर शहराच 1903 सालंच वर्णन या पुस्तकात आले आहे.   सोनूबाई या सोलापूरचे डॉ. प्रभाकरराव केसकर यांच्या कन्या होत्या आणि त्या बहुधा सोलापूरच्या पहिल्या महिला डॉक्टर असाव्यात. विशेष म्हणजे, डॉ. आनंदीबाई जोशी ज्या 'वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया' (अमेरिका) मध्ये शिकल्या, तिथेच सोनूबाई आणि लेखिका एकत्र शिकल्या होत्या. हे पुस्तक १९१३ मध्ये प्रकाशित झाले असले तरी, त्यातील घटना या १९०३ सालातील प्लेग आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या आहेत.

प्रकरण १: बॉम्बे (मुंबई)
"उद्या सकाळी बॉम्बे (मुंबई)!" जेवणावरून उठताना कॅप्टनने उत्साहाने घोषित केले आणि आम्हाला समजले की आमचा लांबचा प्रवास आता संपला आहे. समुद्रावरील जीवन आणि तिथल्या मैत्रीच्या आठवणी खूप आनंददायी होत्या, पण ती शेवटची संध्याकाळ नेहमीच्या हास्यविनोदाने साजरी करण्याऐवजी, प्रत्येकजण आपापल्या विचारात मग्न असल्याने डेकवर विचित्र शांतता होती. मध्यरात्रीसुद्धा मी पाण्याकडे एकटक पाहत होते, समुद्राचा तो अफाट एकांत माझ्या मनात घर करत होता. भारतात काम करण्याचे माझे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात येणार होते. अनेक वर्षांपासून माझ्या भारतातील लहान बहिणी मला मदतीसाठी साद घालत होत्या आणि आता मी त्यांच्या जवळ पोहोचले होते. त्या विचाराने मी भारावून गेले होते, कारण इतरांना कसे जगावे हे शिकवणारी मी कोण होते? माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मला पुन्हा घरी परत जावेसे वाटत होते - होय, अगदी मनापासून! पण हा भित्रेपणा झाला असता; म्हणून, हुंदका आवरत मी स्वतःलाच समजावले, "आता मागे वळून बघायचे नाही! पूर्वेकडे चला!" (Eastward ho!) आणि मी माझ्या केबिनमध्ये गेले, जिथे सोनूबाईशी बोलल्यामुळे मला थोडा धीर मिळाला.
सोनूबाई ही माझी कॉलेजमधील मैत्रीण होती आणि ती माझ्यासोबत सोलापूरला आपल्या घरी परतत होती. तिचे वडील डॉ. प्रभाकरराव केसकर आणि आई (जे मूळचे ब्राह्मण असून त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि नुकत्याच झालेल्या भयंकर दुष्काळात पीडितांसाठी अत्यंत उदात्त आणि त्यागपूर्ण काम केले होते, तसेच जे आता सोलापूरच्या ख्रिश्चन अनाथाश्रम आणि कुष्ठधामचे वैद्यकीय अधीक्षक होते) यांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे, माझे कामाचे नियोजन होईपर्यंत त्यांच्यासोबत राहण्याचे मी ठरवले होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो तेव्हा प्रत्येकजण उत्साहाने भरलेला होता, कारण आमच्यासमोर घोड्याच्या नालेच्या आकाराचे, नीलमणीसारखे निळेशार पाणी असलेले मुंबईचे बंदर दिसत होते.
माझे डोळे प्रत्येक गोष्ट टिपून घेण्यासाठी आतुर झाले होते: मोठी वाफेची जहाजे आणि इतर सागरी वाहने किनाऱ्यापासून दूर नांगरलेली होती; स्थानिक कोळीवाल्यांच्या लहान शिडाच्या बोटी (tom-tits) इकडे तिकडे फिरत होत्या; आणि पांढऱ्या शुभ्र किनाऱ्यामागे हिरव्या झाडांची रांग होती. धक्क्यावर (Pier) रंगांची उधळण झाली होती - शेकडो भारतीय पुरुष सणासुदीच्या कपड्यात, आणि त्यांच्यामध्ये काही परदेशी व पांढऱ्या कपड्यातील इंग्रज लोक - आमच्या महाकाय जहाजाचे स्वागत करण्यासाठी आले होते.
आम्ही जहाजावरून छोट्या बोटीने (Tender) धक्क्याकडे निघालो होतो, तेव्हाच सोनूबाई आनंदाने ओरडली, "ते बघा, बाबा आले!" आणि दुसऱ्याच क्षणी डॉ. केसकर आणि मुंबईचे रेव्हरंड डॉ. करमरकर आमचे मनापासून स्वागत करत होते. कस्टम्सची तपासणी पार पडल्यावर आम्ही डॉ. करमरकरांच्या घराकडे निघालो.
रस्त्यावरून विविध रंगांच्या आणि पोतांच्या साड्या नेसलेल्या स्त्रिया संथ गतीने आणि मान खाली घालून चालल्या होत्या. त्यांचे दागिने चेहरा, गळा, हात आणि पाय झाकून टाकत होते आणि प्रत्येक पावलागणिक त्यांचा आवाज होत होता. काही पुरुषांनी साधे कपडे घातले होते, तर काहींचा पोषाख मोरालाही लाजवेल असा होता - निळा कोट, किरमिजी रंगाचे जाकीट, लाल विजार, गुलाबी फेटा आणि पिवळे बूट! किंवा अशाच काही भडक रंगांच्या मिश्रणाचे कपडे घालून ते चालले होते. अंध भिकाऱ्यांचे रडवेले आवाज त्या गोंगाटातही ऐकू येत होते. आणि शहरातली ती लहान मुले - जी आईच्या कडेवर होती किंवा रस्त्यावर धावत होती, ज्यांच्या गुबगुबीत अंगावर कपड्यांऐवजी फक्त त्यांची चमकदार तपकिरी त्वचा होती.
गर्दीने खचाखच भरलेल्या, अस्वच्छ बाजारातून, जिथे लठ्ठ दुकानदार, त्यांची छोटी उघडी दुकाने आणि मालाची धूळयुक्त गोंधळलेली मांडणी होती, तिथून बाहेर पडून आम्ही रुंद आणि हिरवाईने नटलेल्या 'एस्प्लेनेड रोड'वर (Esplanade Road) आलो तेव्हा खूप हायसे वाटले. इथून जाणारी गर्दी एखाद्या गोष्टीच्या पुस्तकातील मिरवणुकीसारखी होती: उन्हाळी कपड्यात घोड्यावर स्वार झालेल्या इंग्रज स्त्रिया आणि पुरुष, किंवा हाईड पार्क (Hyde Park) किंवा फिफ्थ एव्हेन्यू (Fifth Avenue) च्या शैलीत नटलेले लोक उघड्या बग्गीतून आरामात जात होते; लष्करी अधिकारी बेफिकीरपणे घोडे दौडवत होते; पडदे लावलेली पालखी, ज्यामध्ये कदाचित एखादी "जनान्यातील स्त्री" असावी, ती वाहून नेली जात होती, तिच्या मागे घोड्यावर बसलेल्या दासी आणि पालखीच्या बाजूने घोड्यावर जाणारा एखादा भारतीय गृहस्थ - पती किंवा मुलगा - ज्याच्या दोन्ही हातात लगाम आणि हात ऐटीत हलत होते. तिथे काळ्या सावळ्या रंगाच्या 'आया' (Ayahs) पांढऱ्या शुभ्र कपड्यात होत्या, ज्यांच्याकडे नटलेल्या इंग्रज मुलांची जबाबदारी होती.
करमरकरांच्या घरी, डॉ. (सौ.) करमरकर, ज्यांनी फिलाडेल्फियाच्या त्याच कॉलेजमधून वैद्यकीय पदवी घेतली होती जिथे मी शिकले होते, त्यांनी आमचे प्रेमाने स्वागत केले. संध्याकाळी त्यांनी आणि डॉ. करमरकरांनी त्या दिवशी भारतात आलेल्या सर्व मित्रांसाठी एक मेजवानी (Jawan - जेवण) दिली.
जमिनीवर लाल खडूने सुंदर नक्षी (रांगोळी) काढली होती आणि मध्यभागी लाल गुलाबांची सजावट होती. आम्ही उत्तमोत्तम कपडे घालून, रंगीबेरंगी गालीच्यांवर मांडी घालून (Turk-fashion) बसलो होतो. केळीच्या पानांवर वाढलेले जेवण आम्ही हाताने (चमच्या शिवाय) खात होतो. आमच्या गळ्यातील गुलाबी गुलाब आणि पांढऱ्या मोगऱ्याच्या हारांमुळे त्या अनौपचारिक मेजवानीला अधिकच शोभा आली होती. माझ्या बाजूला बसलेल्या गृहस्थांनी मला हिंदू जेवणाची पद्धत शिकवली. अन्नाला फक्त उजव्या हाताने स्पर्श करायचा, आणि तेही फक्त अंगठा आणि पहिल्या दोन बोटांनी - बोटांच्या पहिल्या पेराच्या खाली अन्नाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही; पाणी पिताना ओठांना स्पर्श न करता वरून पाणी तोंडात ओतायचे. हे बोटे आणि पाण्याचे प्रकरण ऐकायला सोपे वाटत असले तरी, करून पाहा! मला भारतीय जेवण आवडले असले तरी, ते मला लहानपणीच्या सहलीच्या जेवणासारखे वाटले - पौष्टिक पदार्थांपेक्षा गोड आणि मसालेदार पदार्थच जास्त होते.
चहापाने, जेवण, स्वागत समारंभ आणि विविध मिशन संस्थांमधील सेवा यांमुळे मुंबईतील अमेरिकन मिशनरी आणि डॉ. केस्करांच्या ख्रिश्चन मित्रांनी आमचा वेळ इतका आनंदात घालवला की, आमची मुंबईची भेट कधी संपली आणि आम्ही सोलापूरला कधी निघालो हे कळलेच नाही.
सोलापुरातील जीवन (Life at Sholapur)
सोलापूरपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात, सोनूबाई आणि मला आमचा रेल्वे डबा (Coach) पूर्णपणे मोकळा मिळाला. डब्याच्या दोन्ही बाजूंना आठ फूट लांब, चामड्याची गादी असलेली आसने (Seats) होती आणि या आसनांच्या वर, तितकीच रुंद आणि चामड्याची गादी असलेली एक मोठी फळी (Shelf) होती, जी 'अप्पर बर्थ' म्हणून वापरली जायची आणि वापर नसताना ती भिंतीला हुक लावून अडकवता येत असे. खालच्या आसनांवर आणि त्या छोट्याशा पण सुसज्ज ड्रेसिंग रूमच्या मध्ये आमच्या सर्व पेट्या आणि गाठोडी मावतील इतकी जागा असल्याने, आम्ही हमालांना आमचे सामान आमच्या डब्यातच ठेवायला सांगितले. त्यानंतर, अंगावर चादरी ओढून आम्ही त्या लांब आसनांवर आरामात पाय पसरले आणि गाडी सोलापूरला पोहोचेपर्यंत गाढ झोपलो.

शहरात प्लेगची साथ असल्याने केस्कर कुटुंब सोलापूरच्या बाहेरील भागात त्यांच्या अनाथाश्रमात (Orphanage) वास्तव्यास होते. तिथे पोहोचल्यावर संस्थेतील शेकडो अनवाणी, सावल्या रंगाच्या मुला-मुलींनी आमचे स्वागत केले. मुलांनी पांढरा शुभ्र फेटा, धोतर आणि कोट घातला होता, तर मुलींनी त्यांची आकर्षक लाल साडी डोक्यावरून आणि खांद्यावरून घेऊन खाली घोळदारपणे नेसली होती. आम्ही जवळ जाताच त्यांनी आनंदाने स्वागताचे गाणे म्हणायला सुरुवात केली - लांबवरून कुष्ठरोग्यांनीही (Lepers) त्यात सूर मिसळले. जेव्हा मुलांनी हसऱ्या चेहऱ्याने आणि मोठ्या आवाजात "सलाम!" करून गाणे संपवले, आणि सोनूबाईच्या आईने आणि दोन धाकट्या बहिणींनी तिचे अश्रूभरल्या डोळ्यांनी मिठी मारून आणि माझे प्रेमाने स्वागत केले, तेव्हा मी आतापर्यंत पाहिलेल्या सर्वात विचित्र आणि मोहक नृत्यांपैकी एक नृत्य सुरू झाले.(लेझीम) सुमारे वीस लहान मुलांचा एक गट दोन रांगांमध्ये विभागला गेला. त्यांच्या हातातील साध्या चिपळ्यांच्या आणि ढोलाच्या मोठ्या आवाजाच्या तालावर शरीर आणि अवयव लयबद्धतेने हलवत ते कधी एका पायावर तर कधी दुसऱ्या पायावर उभे राहायचे; गोल गोल फिरायचे; समोरच्या रांगेतून नागमोडी वळणे घेत, एकमेकांत गुंतत पिंगा घालायचे; टाचांवर बसून खाली वाकायचे आणि पुन्हा हवेत तरंगल्यासारखे हलकेच उभे राहायचे. हे सर्व पुन्हा पुन्हा, सुरुवातीला हळू, नंतर वेगाने आणि अजून वेगाने, जोपर्यंत ते छोटे नर्तक दमून हसत हसत जमिनीवर कोसळले नाहीत आणि आम्ही टाळ्यांचा कडकडाट केला नाही.

आम्ही पुढे जात असताना, एकामागून एक गट आमच्याकडे आले, त्यांच्या प्रमुखाने आमच्या गळ्यात गुलाबी गुलाब आणि पिवळ्या झेंडूच्या फुलांचे हार घातले. शेवटी आम्ही एका थंड, छत असलेल्या व्हरांड्यात पोहोचलो, जिथे आम्ही डॉ. केस्करांचे स्वागताचे भाषण ऐकले, त्यानंतर आमच्या सुरक्षित आगमनाबद्दल कृतज्ञतेची प्रार्थना आणि गाणी झाली.

मला तिथली स्थानिक भाषा समजत नसली तरी, माझ्याभोवती जमा झालेल्या लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, समाधान आणि "पापा" आणि "मम्मा" (जसे ते डॉ. आणि सौ. केस्करांना म्हणत) यांच्यावरील मनापासूनचे प्रेम मला सहज वाचता येत होते. हे समजणे कठीण होते की माझ्याभोवती जमा झालेली ही गुबगुबीत, हसऱ्या चेहऱ्याची मुले-मुली १८९९ आणि १९०० च्या भयंकर दुष्काळातील तीच मुले आहेत - ती केविलवाणी हाडांची सापळे, ज्यांचे वर्णन आणि फोटो जगभरातील वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले होते.

स्वागताचे सोहळे पार पडल्यानंतर, माझी ओळख भारतीय गृहजीवनाशी करून देण्यात आली. अतिशय आदरातिथ्यशील अशा केस्कर कुटुंबीयांनी मला आनंद देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. सौ. केस्करांनी स्वतः लक्ष घालून माझ्यासाठी इंग्लिश पद्धतीचे जेवण तयार करवून घेतले - कारण भारतीय कढी आणि आमटी, ज्यामध्ये भरपूर मिरच्या असत, माझ्या घशाला त्रासदायक ठरत होत्या. स्वयंपाकीणबाई 'गुराम्मा' मातीच्या चुलीवर ठेवलेल्या भांड्यांमधून कुशलतेने हे पदार्थ वाढत असे. भारतीय खेड्यांमधील घरांमध्ये धुराडे (Chimneys) नसतात, पण गुराम्मा मात्र डोक्यावरून फिरणाऱ्या आणि स्वयंपाकघर भरून टाकणाऱ्या धुराच्या लोटांमध्येही हसत-खेळत काम करत असे, ज्या धुरामुळे मला त्या खोलीतून नुसते जातानाही खोकल्याची उबळ येत असे.

माझ्या दिवसाची सुरुवात 'सुवर्णमाला'ने व्हायची. हे वजनदार नाव माझ्या एका लहान सेविका मुलीचे होते, जी शाळेची वेळ वगळता सकाळपासून रात्रीपर्यंत जवळपासच असायची. जेव्हा सकाळचा सूर्य मला झोपेतून जागे करायचा, तेव्हा मला सुवर्णमालाची गुबगुबीत आकृती खोलीत वावरताना दिसायची. मी जागी झाल्याचे पाहून ती खाली वाकून आदरपूर्वक 'सलाम' करायची आणि तिची मदतनीस 'भागू'ला (भारतात मदतनीसालाही मदतनीस असतात) बोलावून माझी 'छोटी हाजरी' (छोटा नाश्ता) - चहा, टोस्ट आणि जेली - आणायला सांगायची. अनेकदा, एखाद्या शुल्लक गोष्टीसाठीही ती कृतज्ञता व्यक्त करताना खाली वाकून माझ्या गाऊनच्या काठाचे मुके घ्यायची. मी तिला ही सवय मोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या सर्व समजुतीनंतरही ती रडत रडत विनवणी करायची की तिला माझे कपडे स्पर्श करण्यासही अपात्र समजू नये, त्यामुळे मी नाईलाजाने ते स्वीकारले.

दिवसाचा बहुतेक वेळ मुलांच्या विविध आजारांवर उपचार करण्यात जायचा, कारण सोलापूरला आल्यावर लवकरच सोनूबाई आणि मी अनाथाश्रमासाठी एक छोटा दवाखाना सुरू केला होता. त्यानंतर, तिन्हीसांजेला आम्ही कंपाउंडमध्ये फिरायला जायचो. तेव्हा आम्हाला 'हॅमेलिनच्या पावावाल्या'सारखे (Pied Piper of Hamelin) वाटायचे, कारण मुले आम्हाला सर्व बाजूंनी घेरायची आणि आमच्या मागे लांब रांग लावून चालायची. ती आमच्या कपड्यांना आणि बोटांना धरून एकमेकांशी आणि आमच्याशी आनंदाने बडबड करायची. रात्री मुले झोपल्यानंतर, सोनूबाई आणि मी त्या छोट्या आईच्या (सौ. केसकर) बाजूला खुर्च्या टाकून बसायचो आणि त्या गोड मराठी अभंग गाताना किंवा इंग्रजी आणि मराठीच्या मिश्र भाषेत हिंदू पौराणिक कथा सांगताना ऐकायचो.

या शांत जीवनात अचानक जंगलातील धक्कादायक दृश्ये आणि आवाज यायचे, त्यामुळे काही दिवसांनंतर मला कशाचेच आश्चर्य वाटेनासे झाले, उलट काही घडले नाही तरच आश्चर्य वाटायचे! कधीतरी "साप!" असा ओरडा हवेत गुंजायचा; कुणीतरी साप पाहिला असायचा आणि शाळेतली मुले काठ्या घेऊन त्या सरपटणाऱ्या प्राण्याला - मग तो नाग असो वा अजगर - शोधायला धावायची, ज्याला सुटकेची फारशी संधी नसायची. कधी पुन्हा कुणीतरी ओरडायचे की कंपाउंडमध्ये पिसाळलेला कुत्रा आला आहे - पूर्वेकडील बेवारस, केविलवाण्या भटक्या कुत्र्यांचे जीवन अनेकदा रेबीजने (Hydrophobia) संपते - आणि काही क्षणांतच त्याला काठ्यांनी मारतानाचे त्याचे किंचाळणे ऐकून माझ्या अंगावर काटा यायचा. कोल्ह्यांची कुईकुई रात्रभर विचित्र, गूढ आवाजांनी भरून टाकायची; एखादा कोल्हा कंपाउंडमधून धावत जायचा; एखादे घुबड घरात उडून यायचे; किंवा एखादा डौलदार उंट हळूवारपणे धूळयुक्त रस्त्यावरून चालत जायचा, ज्याच्या पाठीवर काळा सावळा, रांगडा वाळवंटी माणूस स्वार असायचा.

एकदा उंटांचा एक तांडा जात असताना डॉ. केस्करांनी चालकाला मला रपेट मारू देण्याची विनंती केली. उंट मात्र माझ्याइतका खुश नव्हता, खाली बसताना त्याने अतिशय नाखुशीने गुरगुरणे केले. त्याच्या पाठीवरच्या मोठ्या गाठोड्यावर आमचीच एक रग (Rug) टाकण्यात आली. त्या प्राण्याने पुन्हा तेच भयानक आवाज काढले, आणि तो हळूहळू उभा राहीपर्यंत मी गाठोड्याच्या दोरांना जीव मुठीत धरून पकडून ठेवले. जेव्हा उंटाला समजले की त्याच्या चालकाने मला फेरफटका मारायलाच लावायचे ठरवले आहे, तेव्हा तो थोडा शांत झाला; मग मी स्वतःचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत आणि त्या मोठ्या वशिंडाच्या भयानक झोल्यांशी जुळवून घेत, प्रतिष्ठेपेक्षा विजयाच्या भावनेने कंपाउंडभोवती एक चक्कर मारली.

जेव्हा नाताळ (Christmas) आला - उष्णकटिबंधातील माझा पहिला नाताळ - तेव्हा मला वाटले की मी स्वप्नातच जगत आहे. हवामान अतिशय उत्तम होते, आकाश गडद, चमकदार निळे होते, ढग म्हणजे केवळ कापसाचे पुंजके होते आणि गुलाबांच्या व गवती चहाच्या सुगंधाने भरलेली मंद झुळूक एखाद्या बाळाच्या हाताच्या स्पर्शाप्रमाणे माझ्या गालाला स्पर्श करत होती. मैत्रीपूर्ण चिमण्या जमिनीवर उड्या मारत होत्या किंवा छताच्या तुळयांवर चिवचिवाट करत होत्या; सरडे भिंतीवर उन्हात पळत होते; लहान खारी दारात खेळत होत्या किंवा लाजत-बुजत डोकावून पाहत होत्या. खिडकीतून आम्हाला पार्श्वभूमीवर हिरवेगार फळबागा आणि एक गोल पूर्वेकडील विहीर दिसत होती. लहान तपकिरी मुले झाडाखाली खेळत होती किंवा तलावात आनंदाने पाणी उडवत होती; बकऱ्या आणि त्यांची पिल्ले खडकांवर उड्या मारत होती किंवा मागच्या पायांवर उभे राहून कोवळी पाने खाण्यासाठी धडपडत होती; हिरवेगार पोपट हवेत विहार करत होते; आणि रानटी कबुतरांचे घुमणे शेजारच्या झाडावरील कावळ्यांच्या कर्कश कावकावशी मिसळत होते.

नाताळच्या पूर्वसंध्येला आणि रात्रभर, पुरुष आणि मुलांचे गट आमच्या खिडकीखाली येऊन जुन्या पद्धतीची नाताळची गाणी (Carols) गात होते; आणि आता नाताळच्या दिवशी, कंपाउंड मुलांच्या गाण्यांनी आणि खेळांच्या हास्याने दुमदुमले होते; अगदी बिचारे कुष्ठरोगीही नाताळच्या उत्साहात सहभागी झाले होते; आणि जीवन जगण्यासारखे वाटत होते.

बांगडीवाल्याच्या येण्याने आनंदात आणि उत्साहात भर पडली. सौ. केस्करांच्या मार्गदर्शनाखाली, त्याने शाळेतील प्रत्येक मुलीला चमकदार काचेच्या बांगड्यांची जोडी दिली. या छोट्या मुलींनी, बांगड्या हातात सरकवताना वेदनेने डोळ्यात पाणी आले तरी, सर्वात लहान मापाच्या बांगड्यांचा हट्ट धरला होता. पाहुणी म्हणून मलाही बांगड्या देण्यात आल्या. मात्र, मी वेदना सहन करण्यास नकार दिला आणि बांगडीवाल्याची नाराजी पत्करून, माझ्या हातात सहज जातील अशा बऱ्यापैकी मोठ्या बांगड्यांचा हट्ट धरला.

अनाथाश्रमातील मुलांना भेटवस्तू वाटल्यानंतर, केसकर कुटुंब आणि मी कुष्ठरोग्यांच्या आश्रमात गेलो. जरी काही दुर्दैवी कुष्ठरोग्यांमध्ये आजाराची बाह्य लक्षणे दिसत नव्हती, तरी बहुतेकांचे डोळे निस्तेज झाले होते आणि चेहरे सुजलेले व सुरकुतलेले होते, जे प्रगत कुष्ठरोगाचे लक्षण होते, आणि अनेकांना बोटे किंवा पायाची बोटेही नव्हती. काही काळासाठी त्यांच्या डोळ्यांतील नैराश्य नाहीसे झाले होते आणि त्यांनी आनंदाने त्यांना दिलेल्या भेटवस्तू स्वीकारल्या, आणि मोठ्याने "टँक्यू!" (Tankoo!) आणि डौलदार सलाम केला. तीन वर्षांच्या रुबीने पूर्ण प्रयत्न केला, पण तिला फक्त अनिश्चितपणे हात हलवता आला आणि गालावरच्या खळीने ती कृती पूर्ण केली. त्या हुशार बाळाचे दुर्दैव आठवून मला थरकाप सुटला. इतक्या लहान वयातही तिच्या अंगावर आजाराचे डाग दिसत होते!

भेटवस्तू दिल्यानंतर, कुष्ठरोग्यांनी ढोल आणि चिपळ्यांच्या साथीने आमची गाणी गायली आणि मग आम्ही अनाथाश्रमात आणि नाताळच्या जेवणासाठी परतलो. पुलाव (भात आणि बकऱ्याचे मटण एकत्र शिजवलेले) आपल्याकडील टर्कीची जागा घेतो आणि मुलांचे डोळे चमकत होते जेव्हा ते जमिनीवर पूर्ण समाधानाने बसून, रचलेल्या ताटांमध्ये पुन्हा पुन्हा बोटे बुडवत होते किंवा त्यांच्या कथिलाच्या पेल्यातून पाण्याचे मोठे घोट घेत होते.

बाळ 'असियाबाई' पुलाव खाण्यासाठी खूपच लहान होती, पण तिचे हुंकार आणि खुदकन हसणे हे सांगत होते की तिनेही नाताळचा आनंद लुटला. बाळ असियाबाई ही डॉ. केस्करांच्या वैद्यकीय यशाचे एक प्रतीक आहे. नाताळच्या काही महिने आधी, डॉ. केस्करांना ती एका झोपडीच्या कोपऱ्यात उपासमारीच्या उंबरठ्यावर सापडली होती. भुकेले उंदीर तिची बोटे आणि पायाची बोटे कुरतडत होते आणि जवळच पाच मृतदेह, प्लेगने ग्रस्त, पडलेले होते. डॉक्टरांनी त्या रडणाऱ्या बाळाला अनाथाश्रमात आणले आणि एका पालनकर्त्या आईच्या स्वाधीन केले, जिने तिला प्रेमाने पुन्हा जिवंत केले. हाता-पायांच्या जखमा लवकरच भरल्या, सुकलेले शरीर गुबगुबीत झाले आणि जेव्हा आम्ही तिला हसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिच्या गालावर खळ्या पडल्या.

नाताळच्या वेळी आमची एकच दुःखाची गोष्ट म्हणजे 'कंकू'ला कुष्ठरोग झाल्याचे समजणे. कंकू, दक्षिण भारतातील एक मुलगी आणि आमच्या मराठी मुलांमध्ये खरोखरच परकी होती. इतर मुलांनी तिच्या दाक्षिणात्य भाषेवरून आणि चालीरितींवरून केलेल्या चेष्टेमुळे ती अनेकदा रडत असे. तिच्या लाजाळू, घरची आठवण काढणाऱ्या भारतीय मनाला एकच आनंद होता तो म्हणजे कुष्ठरोग्यांच्या आवाराबाहेर उभे राहून आतल्या दोन-तीन कुष्ठरोगी मुलींशी बोलणे, ज्या तिच्याच दक्षिणेकडील जिल्ह्यातील होत्या. नंतर, नाताळच्या दिवशी, आम्हाला कंकूमध्ये कुष्ठरोगाची स्पष्ट लक्षणे आढळली आणि हे कटू सत्य सांगताना तिला किती दुःख होईल या भीतीने आम्ही तिला ते हळूच सांगितले. पण आमच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही जेव्हा कंकू आनंदाने हसली, "आता मी माझ्या स्वतःच्या लोकांसोबत राहू शकेन," आणि ती कुष्ठरोग्यांच्या आश्रमातील आपल्या देशभगिनींकडे धावत गेली.

नवीन वर्षाचे स्वागत सोलापूरच्या एका प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबाकडे जेवणाने करण्यात आले. या आमंत्रणाने मला आश्चर्य वाटले, पण डॉ. केस्करांनी समजावून सांगितले की, ज्या ब्राह्मण गृहस्थांनी आमंत्रण दिले होते, ते विचारांनी इतर ब्राह्मणांपेक्षा कमी सनातनी होते; ते इंग्लंड आणि अमेरिकेला जाऊन आले होते, ज्यामुळे त्यांचे जातमोड झाली होती; परंतु ते पारंपारिक कपडे घालत, सर्व विधी पाळत आणि शुद्धीकरणाचे सर्व सोहळे त्यांनी पार पाडले होते त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजात पुन्हा स्वीकारले गेले होते. त्या ब्राह्मणांच्या पत्नीने लाजत लाजत आमचे स्वागत केले आणि सर्व मुलांना आम्हाला भेटायला आणले; पण ती मुले आमच्याबरोबर जेवायला बसली नाहीत, कारण ब्राह्मण स्त्रिया पुरुष जेवून झाल्यावर जेवतात तिथे अनेक हिंदू पाहुणे उपस्थित होते आणि आम्ही जमिनीवर बसलो होतो. एकदा, जेवण माझ्या बाजूला ठेवण्याऐवजी, मी नकळत ते वाढणाऱ्याच्या हातातून घेतले, ज्यामुळे तो बिचारा बाटला आणि त्याला तात्काळ शुद्धीकरणासाठी स्नान करावे लागले.

कुटुंबाचा मोठा मुलगा, एक तरुण पुरुष, पांढरे धोतर आणि शर्ट घालून जेवणाला आला होता. मला सांगण्यात आले की शर्ट माझ्या भावनांचा आदर करण्यासाठी घातला होता, कारण ब्राह्मण सहसा जेवताना फक्त धोतर नेसतात. त्यांनी पाळलेली आणखी एक  प्रथा म्हणजे प्रत्येक पानाच्या ताटाभोवती पाण्याचे वर्तुळ (चित्राहुती) काढणे आणि देवासाठी अन्नाचा एक घास जमिनीवर ठेवणे. ही हिंदूंची "प्रार्थना" (Grace) आहे.

स्त्रियांचा निरोप त्यांच्या दालनात घेऊन, आम्ही बैठकीच्या खोलीत पुरुषांना भेटलो, थोडा वेळ गप्पा मारल्या आणि घराकडे निघालो. आमचा गाडीवान त्याच्या सपाट लाकडी सीटवर मांडी घालून बसला होता आणि बैलांना पायाच्या बोटांनी गुदगुल्या करून किंवा त्यांची शेपटी पिळून वेगाने पळवत होता. गर्दीच्या बाजारातून जाताना त्याचे ओरडणे वारंवार ऐकू येत होते: "ए, गाडीवाला, बाजू दे! (बाजूला हो!)"

आम्ही जात असताना एक पवित्र भिक्षुक - फकीर - गाणे गात चालला होता, त्याचे मोकळे, विस्कटलेले केस आणि जवळजवळ उघडे शरीर त्याच्या व्यवसायाची साक्ष देत होते. पुढे गेल्यावर, दोन हिंदू गृहस्थ एकमेकांना भेटल्यावर गप्पा मारण्यासाठी पदपथावर बसले होते, ते त्यांच्या टाचांवर बसून संपूर्ण वजन पायाच्या बोटांवर तोलून बसले होते (Squatting).

आम्ही जुन्या किल्ल्याजवळून जाताना, आतील भाग पाहण्यासाठी थांबलो. तिथे प्राचीन हिंदू आणि मुस्लिम जीवनाचे अनेक अवशेष होते. बुरुजाखाली धार्मिक बळी म्हणून जिवंत गाडलेल्या गरोदर स्त्रीची आख्यायिका मी ऐकली. मी काळीची, संहाराची देवता, एक ओबडधोबड, लाल रंगवलेली मूर्ती पाहिली जी मान खाली घालून उभी आहे. असे म्हणतात की तिने शपथ घेतली होती की कोणताही इंग्रज किल्ल्यात पाऊल ठेवणार नाही; आणि जेव्हा इंग्रजांनी जिंकून प्रवेश केला, तेव्हा देवीने लाजेने आणि दुःखाने मान खाली घातली, आणि ती तेव्हापासून वर केलेली नाही. किल्ल्यातील मंदिरात एक अतिशय वेगळी आणि अभिमान बाळगणारी छोटी काली देवी सोन्या-चांदीने आणि दागिन्यांनी मढवलेली आहे, जिचा प्रत्येक डोळा एक मौल्यवान हिरा आहे.

सोलापूरच्या बाहेरून जाताना आम्ही प्लेगमुळे पळून आलेल्या लोकांसाठी उभारलेले मदत कार्य तंबू (relief tents) पाहिले. सोलापूर, सुमारे पंच्याहत्तर हजार लोकसंख्येचे शहर, त्यावेळी दररोज सरासरी छत्तीस लोकांचा मृत्यू पाहत होते, आणि ही संख्या उन्हाळ्यापर्यंत सतत वाढत होती. अशा प्रकारे दिवस जात होते. सोलापूरच्या लोकांनी मला आणखी काही काळ राहण्याचा आग्रह केला असला तरी, मला वाटले की मी माझे भारतातील कार्य सुरू केले पाहिजे. सोलापूरच्या सरकारी शल्यचिकित्सकांनी (Surgeon) मला हॉस्पिटलमधील नियुक्तीसाठी कलकत्त्याला जाऊन कौन्सिलचे अध्यक्ष सर डेन्झिल इबेटसन यांना भेटण्याचा सल्ला दिला, म्हणून मी भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास सुरू केला.


पुन्हा सोलापूर!

स्टेशनवर मिसेस केस्करांनी हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केले, नोकरांनी माझे सामान टांग्यात टाकले आणि आम्ही पहाटेच्या थंड हवेत घरी परतलो.

मी कंपाउंडमध्ये प्रवेश करताच, सर्व मुलांनी रांगेत उभे राहून मला अभिवादन करण्यासाठी त्यांचे आवडते गाणे गायले

"सलाम! सलाम! सलाम! आम्ही तुम्हाला अभिवादन करतो. शांती असो! येशू तारणहार तुम्हाला आशीर्वाद देवो आणि प्रेम आणि दयाळूपणाने दररोज तुमचे रक्षण करो! आनंदाने आम्ही तुम्हाला अभिवादन करतो. शांती! सलाम!"

मी सोलापूरला येऊन काहीच दिवस झाले होते, तोच कंपाऊंडवर एक काळे सावट पसरले. शहरात प्लेगने थैमान घातले होते आणि आता तो आमच्या कंपाऊंडमध्येही आला. आमच्या एका लहान मुलाला अचानक खूप ताप आला आणि तपासणी केली असता, आम्हाला त्याच्या उजव्या हाताखाली थोडी सूज आढळली. त्याला वाचवण्याचे सर्व प्रयत्न करूनही काही तासांतच त्याचा मृत्यू झाला. तो आमच्या खोलीत त्याच्या आईसोबत अनेक रात्री झोपला असल्याने आम्ही सर्व गोष्टींचे काळजीपूर्वक निर्जंतुकीकरण केले. आमची लोकं घाबरून गेली होती; स्वयंपाक्याला उघड्यावर जेवण बनवण्याचे आदेश दिले गेले; मुले इमारतींच्या बाहेर झोपली; आणि प्लेगचा प्रसार रोखण्यासाठी सर्व खबरदारी घेण्यात आली. सुदैवाने, डॉ. केस्करांनी केलेल्या कडक विलगीकरण आणि निर्जंतुकीकरणामुळे आमची माणसे या भयानक साथीतून वाचली आणि थोड्याच वेळात तात्काळ धोका टळला होता.

संकलन / भाषांतर

अतुल देशपांडे

सोलापूर शहराचा इतिहास आणि आठवणी ©

#solapurtales.



Comments

Popular posts from this blog

सोलापूर विमान उड्डाणाच्या नोंदी -1928

काडीची हि किंमत आहे. ( सोलापूर 1908)

१९१० सालचं सोलापूर: जेव्हा मुंबईचे गव्हर्नर सोलापुरात आले होते | Solapur History & Memories